नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून ७/१२ उताऱ्यामध्ये स्पष्टता आणि अचूकता आणण्यासाठी तब्बल ५० वर्षानंतर महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ७/१२ उताऱ्यामध्ये करण्यात आलेले बदल कोणते आहेत? याबाबतची संपूर्ण माहिती आपण सदर लेखांमध्ये सविस्तर पाहूया.
७/१२ उतारा म्हणजे काय?
७/१२ उतारा हा एक प्रकारे जमिनीचा आरसा असतो. आपल्याला ७/१२ उतारा वाचून प्रत्यक्ष शेत जमिनीवर न जाता त्या शेतजमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला ७/१२ उताऱ्याच्या माध्यमातून बसल्या जागी मिळू शकतो. ७/१२ उतारा हा महाराष्ट्रातील जमिनीचे मालकी हक्क, पिके, क्षेत्रफळ, जमिनीचा प्रकार आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी वापरला जाणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ७/१२ उतारा महसूल विभागाकडून दिला जातो. याचा उपयोग जमिनीचा कायदेशीर पुरावा म्हणून केला जातो.
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनीच्या हक्कांबाबतच्या संपूर्ण नोंदी ठेवल्या जातात. या नोंदीसाठी वेगवेगळी नोंदणी पुस्तके असतात. या नोंदणी पुस्तकांमध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, शेतजमिनीवरील पिकांचे हक्क, याबरोबर शेतजमिनीच्या सर्व नोंदीचा समावेश होतो. याचबरोबर २१ वेगवेगळ्या प्रकारचे गावचे नमुने ठेवलेले असतात. यापैकी गावचा नमुना नं ७ मध्ये कोणत्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे हे दर्शवतो आणि गावचा नमुना नं १२ मध्ये सदर जमिनीवर कोणत्या पिकांची लागवड झाली आहे याची नोंद ठेवली जाते. या दोन्हींचा मिळून मिळून ७/१२ उतारा तयार होतो. म्हणून या उताऱ्याला ७/१२ उतारा असे म्हणतात.
७/१२ उताऱ्यामध्ये महसूल विभागाकडून करण्यात आलेले ११ महत्त्वाचे बदल
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने ५० वर्षानंतर ७/१२ उताऱ्यामध्ये महत्त्वाचे ११ बदल केले आहेत. हे नवीन बदल ७/१२ उताऱ्याला अधिक स्पष्टता आणि अचूकता करण्याच्या दृष्टीने केले गेले आहेत. ७/१२ उताऱ्यामध्ये केले गेलेले ११ महत्त्वाचे बदल कोणते आहेत? हे आपण खाली पाहूया:
- गाव नमुना-७ मध्ये आता गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक दिसणार आहे.
- लागवड योग्य आणि पोटखराब क्षेत्र आता स्वतंत्रपणे दर्शवले जाणार आहे. त्याचबरोबर त्यांची एकूण बेरीज सुद्धा दाखवली जाणार आहे.
- आता शेतीसाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’ तर बिन शेतीसाठी ‘आर चौरस मीटर’ ही एक वापरण्यात येणार आहे.
- यापूर्वी ‘इतर हक्क’ मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिसणार आहे.
- मृत व्यक्ती, कर्जाबोजे आणि ई-कराराच्या नोंदी कंसात दर्शवण्याऐवजी आता त्यावर आडवी रेष मारली जाणार आहे.
- फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी आता ‘प्रलंबित फेरफार’ हा स्वतंत्र रखाना असणार आहे.
- सर्व जुन्या फेरफार क्रमांक साठी वेगळा रखाना तयार करण्यात आला आहे.
- दोन खातेदारांच्या नावांमध्ये आता ठळक रेष असणार आहे, त्यामुळे खातेदारांची नावे स्पष्टपणे वाचता येतील.
- गट क्रमांक सोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात आता शेवटी दाखवली जाणार आहे.
- बिन शेती क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हेच एक एक राहणार असून, जोडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आले आहेत.
- बिनशेतीच्या ७/१२ उताऱ्याच्या शेवटी आता ‘सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने गाव नमुना-१२ लागू नाही’अशी विशेष सूचना अकृषक जमिनींसाठी दिली आहे.
वरील सर्व ११ महत्त्वाचे बदल महसूल विभागाकडून ७/१२ उताऱ्यामध्ये करण्यात आले आहेत.
सदर लेखांमध्ये आपण राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून ७/१२ उताऱ्यामध्ये स्पष्टता आणि अचूकता आणण्यासाठी जे ११ बदल करण्यात आले आहेत. याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. राज्यातील शेतकरी वर्गांसाठी हा बदल खूपच महत्त्वाचा आहे. म्हणून आम्ही हे ७/१२ उताऱ्यातील महत्त्वाचे बदल राज्यातील सर्व शेतकरी वर्गाला माहीत व्हावेत यासाठी सदर लेखाच्या माध्यमातून आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आहे. धन्यवाद!




