महिला सबलीकरणासाठी महायुती सरकारने सुरू केलेली “लाडकी बहीण योजना” महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांसाठी एक मोठा आधार बनली आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मध्यमवर्गीय महिलांना या योजनेचा मोठा फायदा होत आहे. मात्र, या योजनेतील काही अटी व नियमांमुळे काही महिलांना दरमहा मिळणाऱ्या रकमेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः, योजनेतून १५०० ऐवजी २१०० रुपये कधीपासून मिळणार यावर सध्या भरपूर चर्चा सुरू आहे.
२१०० रुपये कधी मिळणार?
विधानसभेत आमदार अनिल परब यांनी लाडकी बहीण योजनेतील वाढीव रक्कमेबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकारने अजूनही अधिकृतपणे २१०० रुपयांची घोषणा केलेली नाही. महायुती सरकारच्या निवडणूक जाहीरनाम्यात २१०० रुपये देण्याचे आश्वासन होते, मात्र यासाठीचा निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाईल. त्यामुळे सध्या या निर्णयावर प्रतीक्षा करावी लागेल.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता म्हणजेच ३००० रुपये लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, २१०० रुपये देण्याचा अंतिम निर्णय अद्याप प्रक्रियेत आहे.
आदिती तटकरे सभागृहात काय म्हणाल्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सरकार एखादी योजना जाहीर करते, तेव्हा जाहिरनामा हा 5 वर्षांचा असतो. अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, मात्र सध्या 2100 रुपयांची कोणतीही घोषणा झालेली नाही. यामुळे लाडक्या बहिणांनी 2100 रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे. आदिती तटकरे यांच्या सभागृहातील वक्तव्याने लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली आहे.
योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल नाही
योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांसाठी लागू असलेल्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
- ही योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू आहे.
- ६५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिला या योजनेच्या लाभातून बाद होतात.
- तसेच, विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळत नाही.
महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्ट केले की, अर्ज तपासणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच आर्थिक लाभ मिळणार आहे.
५ टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंतचे कर्ज, सरकारचा व्यवसायांसाठी एक मोठा दिलासा :PM Vishwakarma Yojana 👈
अर्जाची छाननी व लाभार्थी महिलांची स्थिती
योजनेअंतर्गत २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी २ कोटी ५२ लाख महिला पात्र ठरल्या आहेत. अर्जाची छाननी सुरूच राहणार असून, निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येईल.
महिलांसाठी योजना सुरूच राहणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना महिला सशक्तीकरणासाठी सुरू केली होती आणि ती पुढील काळातही सुरूच राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
महिला सबलीकरणासाठी लाडकी बहीण योजना महत्त्वाची
- या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे.
- भविष्यात रकमेची वाढ होणार का, हे येत्या अर्थसंकल्पावर अवलंबून आहे.
सध्या २१०० रुपये कधीपासून मिळतील याबाबत निश्चितता नसली, तरी महिला दिनाच्या आधी ३००० रुपये जमा होणार आहेत, ही बाब लाभार्थी महिलांसाठी समाधानाची आहे. सरकारच्या पुढील निर्णयाकडे लाडक्या बहिणींची नजर लागली आहे.




